कोकणातील नमन.
कोकणात नमन म्हणजे दशावतार यास खूप महत्व आहे. हा लोकनाट्य
प्रकार कधी सुरु झाला यावर काही ठोस पुरावा नाहि. साधारण आठव्या शतकात हि
लोककला कोकणात जन्माला आली व कोकणातील रसिक रयतेने तिला जोपासली.,लोकाश्रय
दिला.तळ कोकणातील दशावतार व उत्तर कोकणातील नमन हे जरी सारखे असले तरी
काही बाबतीत फरक असतो,कदाचित दोन वेगवेगळ्या भूप्रदेश्यामुळे असेल.पण
दश्यावतारावर आधारित सोंगे आणणे,पूर्वरंग व उत्तररंग असे दोन भाग समान
असतात. पूर्वरंगात लाकडी मुखवटे घालून गणपती,नटवा,सरस्वती इतर देवतांचे
मुखवटे धारण करून त्यांची पूजा केली जाते.परमेश्वराची महती गाऊन त्याची
कृपा संपादन करणे हा या मागचा हेतू असतो. उत्तर रंगात वगनाट्य सदर केले
जाते. असा काहीसा क्रम असतो.
रत्नागिरी भागात
प्रत्येक गावात देवाचे खेळे असत,शिमग्यात गावातल्या सहाणेवर मृदुंगाची थाप
पडल्या शिवाय दुसऱ्या ठिकाणाची सुपारी नमन मंडळी घेत नसे.त्या नंतरच इतर
गावात वा लग्न समारंभात खेळ होत असे. हि प्रथा अजूनही काही गावात चालू आहे.
शिमग्यात देवीसाठी नवस म्हणून अर्पण केलेल्या साड्या, पासोडे,इतर कपडे
यांच्या पासून आकर्षक वेशभूषा करून पायघोळ झगे शिवत,तसेच डोक्यावरील मंदिल
बनत. गळ्यात रंगीबिरंगी माळा,पायात चाळ,रापलेला पण विलक्षण तेजस्वी
चेहरा,मजबूत देहयष्टि,हातात टाळ असा खेळा सजे. असे दहा ते पंधरा खेळे
रांगेत उभे राहत,त्यांच्या दोन्ही बाजूस तशीच वेशभूषा केलेले दोन मृदुंग
वाजविणारे वाजविणारे वाजपी असत. जर गावच्या सहाणेवर पालखी समोर खेळ असेल तर
गुरव आरती करत असे,सूत्रधार खेळा ती स्वीकारून गुलाल टीका लाऊन खेळ चालू
करण्याची अनुमती घेई. जर घरी खेळ असेल तर घराचा मालक आरती करे. सूत्रधार
टाळ व मृदुंगाच्या तालावर कवनास आरंभ करि. संगतवार देवतांची नावे घेत नमन
करित. पहिले नमान ... जुगाई मातेला,दुसरे नमान …. असे करीत सर्व देवतांना
आवाहन करीत आशीर्वाद घेत असे. हाच सूत्रधार शेवट पर्यंत सूत्र संचालन करि.
ठोस संहिता नसली तरी पाठांतर चोख असल्याने परंपरेने चालत आलेल्या मौखिक
संहितेवर सारे संचलन चाले. गणपती,नटवा,गोमू,शंकासूर,शंकर,पार्वती
अशी पात्रे एका मागोमाग एक येत. त्याची वर्दी सूत्रधार कवनातून देत असे.
मग थाट माट करून सप्त गवळणीचा मेळा मथुरेच्या बाजरी निघे,तो पेंद्या व
सुदामा (बहुत करून पिंपळाच्या पारा जवळ) अडवत. मग राधा,मावशी यांचे त्या
दोघां सोबतचे चटपटीत संवाद होत. शेवटी श्री कृष्णाला यावे लागे.तो आपली ओळख
एका विशिष्ट प्रकारे देत असे. मग साऱ्या गवळणी कृष्णास शरण जात.ते
सांगताना ती मी कोणा सारखी शरण आले ते वर्णन करि. गवळण,"कृष्णा,मी तुला शरण
आले आहे." कृष्ण,"कोना वानी ?" गवळण,"गरीब कपिले गायी
वानी."कृष्ण,"जा,तुला रजा आहे."असे म्हणून तिला मथुरेस जाण्यास संमती देई.
पण राधेस संमती न देता तो राधे सह निघून जाई. असा काही तो प्रवेश असे. या
नंतर कोणत्या तरी पौराणिक प्रसंगावर एक छोटेखणी प्रवेश सादर करित.
सूत्रधार कधी पद्य तर कधी गद्यात सूत्र संचालन करि. त्याला साथ
देत सारे खेळे "कोण्या गती"असे म्हणत टाळ मृदुंगाच्या ठेक्या वर विशिष्ट
पद्धतीने कंबर व पायाची हालचाल करीत सम गाठत. ती लय,तो ताल,तो मृदुंगाचा
ठेका सारे उत्स्पुर्त असे.अंगी भिनल्यागत सारे असे. त्या मागे काही दैवी
शक्ती असावी असा मला भास होतो. असेल हि… कारण हे सारे देवासाठी करतो अशी
त्यांची भावना असते. ग्रामदेवतेवर अपार श्रद्धा असलेला कुणबी समाज हि कला
सादर करि.
उत्तर रंगात वग नाट्य सदर होत असे.
साधारण एक किंव्हा दोन राजपुत्र,राज्याचा प्रधान,राजाचा भाऊ,मेव्हणा
खलनायक असे. अनाथ राजपुत्रांना संकटात टाकून राज्य बळकविन्या साठी सतत
प्रयत्न करि. त्या साठी मारेकरी,कधी राक्षस,अशी मंडळीची नेमणूक करि. पण
साऱ्या संकटांवर मात करीत राजपुत्र आपली गादि परत मिळवीत. असा काहीसा
कथासार असे. शिकारी साठी राजा वा राजपुत्र हमखास जंगलात जात. मग त्यांची
गाठ हरीण,वाघ,अस्वल अश्या प्राणांशी पडे. कधी व्हिलन ने पाठविलेल्या
मारेकरी वा राक्षसांशी युद्ध होई. प्रेक्षकातून अचानक येणारा वाघ अजून
अंगाचा थरकाप उडवतो .उड्या मारीत येणारे हरीण,त्याचा तो डौल अजून आठवतो .
राजाच्या दोन सैनिकांची तारांबळ,चटपटीत संवाद प्रसंगाचे दडपण हलके
करण्यासाठी योजण्यात येत. हा सारा प्रकार फार विलक्षण असे. या सगळ्याचे
सूत्र संचालन सूत्रधार खेळा करि. तो हे कथानक पुढे नेण्याचे काम करि.
माझ्या आठवणी प्रमाणे आजोळी "आंबवली"गावच्या नमनात रामा
भेरे सूत्र संचालन करी,शिडशिडीत पण राकट देहयष्टी,उन्हात रापलेली काया,कणखर
आवाज… खेळा झाला कि त्याच्यात साक्षात नटेश्वर संचारत असे.तसेच मजबूत
देहाचा गोंद्या कारकर अजूनही मनात घर करून आहे. रात्री ११ वाजता सुरु
झालेला खेळ पहिला कोंबडा आर्वे पर्यंत चाले. दूरवर ताश्या कडाडे,आणि
रावणाची पाटी येण्याची द्वाही सूत्रधार देयि. १० तोंडे असलेली प्रचंड
वजनाची लाकडी रावणाची पाटी डोक्यावर सावरत तांडव करीत रावण मंचावर येई.
त्याचा तो खर्जातील आवाज,तो आवेश,तो गर्व,ती नजरेतील मग्रुरी,सम्राट
असल्याची गुर्मी हे सारे तो पार्टी दाखवे.सूत्रधाराशी त्याचे सवाल जबाब
होत,सूत्रधार रावणास डिचवे,रामाचे गुणगान गात चिडवत असे.मग राम व रावणाचे
थरारक युद्ध होई,रावणाचा वध हा नमनाचा परमोच्य बिंदू असे. दुष्ट शक्तींचे
निर्दालन होऊन आनंदी मनाने सारे घरी परतत.
कधी कधी हि रावणाची पाटी डोक्यावर घेऊन काम करणाऱ्या पार्ट्याचे अंगात अशी
काही भिणे कि,देवीस नारळ द्यावा लागे.तेव्हाच तो भूमिका सोडे. हा स्तिमित
करणारा प्रकार मी पहिला आहे. पाटी सह थरथरणारा रावण पार्टी मी अनुभवला
आहे.
आपण अनेक प्रसिद्ध नट पाहिले आहेत,त्यांच्या भूमिका अनुभवल्या
आहेत,पण कोणतेच शिक्षण न घेता केवळ अनुभव व अवलोकनातून प्रामाणिक पणे कला
सदर करणारी हि माणसे मनातून पुसता पुसली जात नाहीत. हाच खरा लोक कलेचा गाभा
असावा,व त्याच मुळे हि लोककला शतकानुशतके जिवंत राहिली आहे.आज या कलेची
काय स्थिती आहे?पारंपारिक नमनाचा कोठे लवलेश नाही. कॅसीओ,कर्ना यांचा
कर्णकर्कश आवाज,उथळपणे कामुक अंगविक्षेप करीत सिनेमाच्या गाण्याचा चालीवर
केलेले भयानक नृत्य,उथळ व फालतू संवाद,त्यामुळे मिनिटभर हि हे नमन पाहता
येत नाही. तांत्रिक बदल जरूर करावेत पण मूळ लोकनाट्याचा गाभा नसेल तर
प्रयोग फसणारच. कहर म्हणजे गवळणीवर होणारा दौलतजादा,हे म्हणजे शहरातील
"डान्सबार"चा हिडीस प्रकार पवित्र अशा लोकनाट्यात येऊ पाहतो आहे. हे सर्व
थांबविणे जरुरीचे आहे. नमन करणाऱ्या मंडळास प्रभोधनाची गरज आहे.शिमग्यात
सहाणेवर गवळणी सोबत नाचून दौलतजादा करणारा माणूस मी पहिला व तो प्रकार सर्व
आया बहिणी,वृध्द मंडळी,लहान मुले यांचा समोर झाला.मन विषन्न झाले. असे
प्रकार थांबविले पहिजेत. हाच आदर्श जर लहान मुलांनी ठेवला तर?निदान सहाणेवर
तरी असा प्रकार होणार नाही,याची काळजी आपण घेतली पहिजे. तरच हि सुंदर
लोककला जिवंत राहील. अन्यथा आठव्या शतकातील हि लोककला आपल्या समोर अस्त
पावेल. येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.