Monday, July 1, 2013

By Mr.Yogesh Jadhav-Yashantrao

देवगिरीचे यादव /राजेजाधव यांचे वारस !! 1)राजेरामदेवराव यादव यांच्या पराभवानंतर त्यांचे पुत्र राजेशंकरदेव हे मंडलिक राजे झाले ,परंतु राजेशंकरदेव यांनी सन १३०९ पासून खंडणी देणे बंद केले..म्हणून सन १३१२ मध्ये शंकरदेव यांना ठार केले....2) शंकरदेव यांचे बंधू भीमदेव हेही ठार झाले...शंकरदेव यांची पतनी & पुत्र गोविंददेव यांचे पालनपोषण त्यांचे मेहुणे हरपालदेव यांनी केले..3) सन १३१६ मध्ये हरपालदेव यांनी बंद करून स्वतंत्र राज्य स्थापन केले...परंतु हरपालदेव सन १६१८ मध्ये जिवंत पकडून सोलून ठार मारले....4) गोविंददेव - यांनी बाग्लांच्या राजाची मदत घेऊन आपली सत्ता जळ्गाव जिल्ह्यामध्ये हतनूर परिसरात स्थापन केली...."in scott's ranslation it is Geodeo. In some copies of ferista,it is Govinddeo,but ferista says the chief of the Naiks was a descendant of Raja of deogadh,Ramdeo Rao Jadow was the raja of Deogadh accourding to all Hindoo Mss,& it isn't improbable that this chief's name may have been Govind deo jadow" Grant duff's history-page no 47......गोविंददेव यांचा १३८० मध्ये मृत्यू झाला...5) ठाकुरजी जाधव देशमुख- गोविंददेव नंतर त्यांचा पुत्र ठाकूरजी गादिवर आले...यांनी हतनूर सोबतच सिंदखेड,पैठण, औरंगाबाद,etc एकूण ५२ प्रांताची सर्देश्मुखी मिळवली...हे १४४० साली मरण पावले...6) भूकणदेव/भेतोजी(1440 to 1500)-ठाकुरजी नंतर त्यांचे पुत्र भूकणदेव गाधिवर आले...यांनी समस्त हिंदू मराठा लोकांना एकत्र आणण्याचे काम केले,यांचा म्रुतुए सन १५०० मध्ये झाला...7) अचालोजी/अचाल्कर्ण( इसवी सन 1500 to 1540)- यांच्या काळातच विजापूरच्या राज्याचे 5 भाग झाले..a) आदिलशाही b) कुतुबशाही c) इमादशाही d) निजामशाही e) बेरीदशाही ...आच्लोजी यांना ५००० घोड्याची मनसब मिळाली...यांच्या काळापासून सरकारी कामकाजात मराठीचा वापर सुरु झाला..8) विठ्ठलदेव(सन 1540 to 1570)...9) ळक्षमनदेव /लखुजीराजे( SAN 1570 TO 1629)

!! राजेलखुजीराव जाधवराव !!

सिंद्खेडकर राजेजाधवराव यांचे घराणे हे मुळ देवगिरीच्या यादव वंशाचीच 1 शाखा आहे.देवगिरीचे सार्वभौम राज्य नष्ट झाल्यानंतर शंकरदेव ह्यांचे पुत्र गोविंददेव जाधव नंतर लखुजीराव यांनी जाधव घराण्याला उर्जितावस्था मिळून दिली. त्यांचे नाव लक्ष्मन्देव/लक्ष्मनसिंह असे होते,परंतु ते लखुजी जाधवराव याच नावाने प्रसिद्ध आहेत.

!! राजेलखुजीराव कुलव्रुत्तांत !!
जन्म:- यांचा जन्माची नोंद इतिहासाला माहिती नाही,परंतु मृत्यू समयी (25 july 1629) त्यांचे वय 80 वर्ष होते, त्यांचा जन्म सन १५५० साली झाला हे ग्राह्य समजणे उचित होईल. *मृत्यू(death):-२५ जुलै १६२९,निझामाने देवगिरी किल्ल्या वर निशस्त्र राजेलखुजीराव,त्यांचे २ पुत्र- राजेअच्लोजी, राजेराघोजी आणि १ नातू राजेयशवंतराव(son of rajedattaji) यांची हत्या केली.

*राजे लखुजीराव जाधवराव ह्यांचा वडिलांचे नाव : राजेविठोजीराव ,*लखुजीराजे जाधव ह्यांचा आईचे नाव: ठाकराईराणी ,*भावाचे नाव : राजे भूतजी ,*राजे लखुजीराव जाधव ह्यांचा पत्नीचे नाव: महाल्साबाई/गिरिजाबाई,यमुनाबाई,भागीरथीबाई , * राजे लखुजीराव जाधव ह्यांचा अपत्यांची नावे:-1) राजेदत्ताजीराव 2) राजेअचलोजीराव 3)राजेबहादुर्जी4) राजेराघोजी 5) स्वराज्याप्रेरिका राजमाता जिजाऊ मासाहेब

राजेलखुजीराव यांचे ४ पुत्र यांच्या वंशजाची गावे :- 1) राजेदत्ताजी-¤जवळखेडा ,¤उमरद(देशमुख) तालुका-सिंदखेडराजा ,करवंड ता चिखली,भुईँज(सातारा), 2)राजेअचलोजी-¤मेहुनाराजा ¤ आडगावराजा तालुका-सिंदखेडराजा ¤माळेगाव (near baramati) ¤मांडवे (जि सातारा) ¤ वाघोली-वाडी (पुणे) 3) राजेबहादुरजी :- ¤ देऊळगावराजा ¤ सिँदखेडराजा ¤ माहेगाव(देशमुख)(कोपरगाव) 4) राजेराघोजी :- माहिती उपलब्ध नाही !! ¤¤ राजेभुतजी / जगदेवराव (brother of rajelakhuji) यांचे वंशज = ¤ किनगावराजा, ¤ दिल्ली

lok-jagar

कीर्तन एक समाज प्रबोधानाचे माध्यम .
शिक्षणा पासून वंचित ठेवलेल्या जनतेच्या ज्ञाणासाठी संत मंडळींनी कीर्तनाचा चांगला वापर केला.
लोक भाषेत ज्ञान दान करताना कीर्तना सारखे सोप्पे,लोकसहभाग असलेले व सर्वांस सामाऊन घेणारे लोक माध्यम संत परंपरेने निवडले.कारण जर त्या काळातील काही रूढी परमपराना छेद देणारे ज्ञान मंदिरात सांगितले असते तर त्याला अनेक अडथळे निर्माण झाले असते,पण मान्दिरांबाहेर पारावर,वाळवंटात कीर्तनाचे व्यासपीठ उभारणात संताची लोकोत्तर हुशारी आपल्या ध्यानात येते.
संतानी कीर्तन परमार्थ साधने पुरते मर्यादित न ठेवता,ते ज्ञान प्रसाराचे माध्यम बनविले.संत म्हणजे समाज शिक्षक,त्याने कीर्तन हे समाज प्रबोधनाचे मध्यम स्वीकारले हे त्यांचे तर्कबुद्धी व विवेक बुद्धीस अनुसरूनच. संतांनी विशेषत: नामदेव महाराजांनी कीर्तन,भारुड या लोक रंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य केले.कीर्तन जरी नवविधा भक्ती मधील दुसऱ्या क्रमाकाचे भक्ती साधन असले तरी संतानी ते ज्ञान प्रसाराचे माध्यम बनविले.
"भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती"असा ज्ञान आणि भक्ती याचा सांधा साधला.ज्ञानदेवांच्या मते ज्ञान हे कर्माचे डोळे आहेत. कर्मा मागील दृष्टि जर निर्दोष असेल तर अमंगलाचा फैलाव होणार नाही.त्या साठी विवेकाचे अंजन घालावे लागते."दुरितांचे तिमिर जावो" हे अभिप्रेत असता अंधार दूर होण्यासाठी नीतिवान कीर्तनकारांची गरज आज भासते आहे.तीनशे वर्षान पासून कीर्तने,प्रबोधने चालू असताना आज काय परिस्थती आहे हे पहाणे अगत्याचे ठरते.
आज सर्वत्र मोठ्या उत्साहाने हरीनाम साप्ताह,कीर्तनाचे,भजनाचे कार्यक्रम केले जातात.पण दुसरी कडे पापाचार बोकाळला आहे.देवाचे देवळातहि दर्शना साठी,प्रसादा साठी पैसे मोजले जातात.सप्ताहाचे महत्व आता रूढी,परंपरा या चाकोरीत अडकलेले पहायला मिळते.त्या मागचा मूळ हेतू विचारात न घेता त्याचे आयोजनातील क्रम,कालबाह्य रूढी, त्यांचे अनाकलनीय समर्थन हेच चित्र दिसते.त्यामुळे नवीन पिढी जी मूळातच बुद्धिवादी,चौकस,तर्कनिष्ठ असल्याने या एका उत्तम प्रबोधन मध्यमा पासून दूर जाताना दिसते.काही वेळा तर देवळातील देवाचे अस्तीत्वालाच नाकारण्या पर्यंत काही लोकांची मजल जाते.असे का बरे होते?काहीतरी चुकते आहे हे मात्र खरे.

kokan lok-kala.

कोकणातील नमन.
कोकणात नमन म्हणजे दशावतार यास खूप महत्व आहे. हा लोकनाट्य प्रकार कधी सुरु झाला यावर काही ठोस पुरावा नाहि. साधारण आठव्या शतकात हि लोककला कोकणात जन्माला आली व कोकणातील रसिक रयतेने तिला जोपासली.,लोकाश्रय दिला.तळ कोकणातील दशावतार व उत्तर कोकणातील नमन हे जरी सारखे असले तरी काही बाबतीत फरक असतो,कदाचित दोन वेगवेगळ्या भूप्रदेश्यामुळे असेल.पण दश्यावतारावर आधारित सोंगे आणणे,पूर्वरंग व उत्तररंग असे दोन भाग समान असतात. पूर्वरंगात लाकडी मुखवटे घालून गणपती,नटवा,सरस्वती इतर देवतांचे मुखवटे धारण करून त्यांची पूजा केली जाते.परमेश्वराची महती गाऊन त्याची कृपा संपादन करणे हा या मागचा हेतू असतो. उत्तर रंगात वगनाट्य सदर केले जाते. असा काहीसा क्रम असतो.
रत्नागिरी भागात प्रत्येक गावात देवाचे खेळे असत,शिमग्यात गावातल्या सहाणेवर मृदुंगाची थाप पडल्या शिवाय दुसऱ्या ठिकाणाची सुपारी नमन मंडळी घेत नसे.त्या नंतरच इतर गावात वा लग्न समारंभात खेळ होत असे. हि प्रथा अजूनही काही गावात चालू आहे. शिमग्यात देवीसाठी नवस म्हणून अर्पण केलेल्या साड्या, पासोडे,इतर कपडे यांच्या पासून आकर्षक वेशभूषा करून पायघोळ झगे शिवत,तसेच डोक्यावरील मंदिल बनत. गळ्यात रंगीबिरंगी माळा,पायात चाळ,रापलेला पण विलक्षण तेजस्वी चेहरा,मजबूत देहयष्टि,हातात टाळ असा खेळा सजे. असे दहा ते पंधरा खेळे रांगेत उभे राहत,त्यांच्या दोन्ही बाजूस तशीच वेशभूषा केलेले दोन मृदुंग वाजविणारे वाजविणारे वाजपी असत. जर गावच्या सहाणेवर पालखी समोर खेळ असेल तर गुरव आरती करत असे,सूत्रधार खेळा ती स्वीकारून गुलाल टीका लाऊन खेळ चालू करण्याची अनुमती घेई. जर घरी खेळ असेल तर घराचा मालक आरती करे. सूत्रधार टाळ व मृदुंगाच्या तालावर कवनास आरंभ करि. संगतवार देवतांची नावे घेत नमन करित. पहिले नमान ... जुगाई मातेला,दुसरे नमान …. असे करीत सर्व देवतांना आवाहन करीत आशीर्वाद घेत असे. हाच सूत्रधार शेवट पर्यंत सूत्र संचालन करि. ठोस संहिता नसली तरी पाठांतर चोख असल्याने परंपरेने चालत आलेल्या मौखिक संहितेवर सारे संचलन चाले. गणपती,नटवा,गोमू,शंकासूर,शंकर,पार्वती अशी पात्रे एका मागोमाग एक येत. त्याची वर्दी सूत्रधार कवनातून देत असे. मग थाट माट करून सप्त गवळणीचा मेळा मथुरेच्या बाजरी निघे,तो पेंद्या व सुदामा (बहुत करून पिंपळाच्या पारा जवळ) अडवत. मग राधा,मावशी यांचे त्या दोघां सोबतचे चटपटीत संवाद होत. शेवटी श्री कृष्णाला यावे लागे.तो आपली ओळख एका विशिष्ट प्रकारे देत असे. मग साऱ्या गवळणी कृष्णास शरण जात.ते सांगताना ती मी कोणा सारखी शरण आले ते वर्णन करि. गवळण,"कृष्णा,मी तुला शरण आले आहे." कृष्ण,"कोना वानी ?" गवळण,"गरीब कपिले गायी वानी."कृष्ण,"जा,तुला रजा आहे."असे म्हणून तिला मथुरेस जाण्यास संमती देई. पण राधेस संमती न देता तो राधे सह निघून जाई. असा काही तो प्रवेश असे. या नंतर कोणत्या तरी पौराणिक प्रसंगावर एक छोटेखणी प्रवेश सादर करित.
सूत्रधार कधी पद्य तर कधी गद्यात सूत्र संचालन करि. त्याला साथ देत सारे खेळे "कोण्या गती"असे म्हणत टाळ मृदुंगाच्या ठेक्या वर विशिष्ट पद्धतीने कंबर व पायाची हालचाल करीत सम गाठत. ती लय,तो ताल,तो मृदुंगाचा ठेका सारे उत्स्पुर्त असे.अंगी भिनल्यागत सारे असे. त्या मागे काही दैवी शक्ती असावी असा मला भास होतो. असेल हि… कारण हे सारे देवासाठी करतो अशी त्यांची भावना असते. ग्रामदेवतेवर अपार श्रद्धा असलेला कुणबी समाज हि कला सादर करि.
उत्तर रंगात वग नाट्य सदर होत असे. साधारण एक किंव्हा दोन राजपुत्र,राज्याचा प्रधान,राजाचा भाऊ,मेव्हणा खलनायक असे. अनाथ राजपुत्रांना संकटात टाकून राज्य बळकविन्या साठी सतत प्रयत्न करि. त्या साठी मारेकरी,कधी राक्षस,अशी मंडळीची नेमणूक करि. पण साऱ्या संकटांवर मात करीत राजपुत्र आपली गादि परत मिळवीत. असा काहीसा कथासार असे. शिकारी साठी राजा वा राजपुत्र हमखास जंगलात जात. मग त्यांची गाठ हरीण,वाघ,अस्वल अश्या प्राणांशी पडे. कधी व्हिलन ने पाठविलेल्या मारेकरी वा राक्षसांशी युद्ध होई. प्रेक्षकातून अचानक येणारा वाघ अजून अंगाचा थरकाप उडवतो .उड्या मारीत येणारे हरीण,त्याचा तो डौल अजून आठवतो . राजाच्या दोन सैनिकांची तारांबळ,चटपटीत संवाद प्रसंगाचे दडपण हलके करण्यासाठी योजण्यात येत. हा सारा प्रकार फार विलक्षण असे. या सगळ्याचे सूत्र संचालन सूत्रधार खेळा करि. तो हे कथानक पुढे नेण्याचे काम करि.
माझ्या आठवणी प्रमाणे आजोळी "आंबवली"गावच्या नमनात रामा भेरे सूत्र संचालन करी,शिडशिडीत पण राकट देहयष्टी,उन्हात रापलेली काया,कणखर आवाज… खेळा झाला कि त्याच्यात साक्षात नटेश्वर संचारत असे.तसेच मजबूत देहाचा गोंद्या कारकर अजूनही मनात घर करून आहे. रात्री ११ वाजता सुरु झालेला खेळ पहिला कोंबडा आर्वे पर्यंत चाले. दूरवर ताश्या कडाडे,आणि रावणाची पाटी येण्याची द्वाही सूत्रधार देयि. १० तोंडे असलेली प्रचंड वजनाची लाकडी रावणाची पाटी डोक्यावर सावरत तांडव करीत रावण मंचावर येई. त्याचा तो खर्जातील आवाज,तो आवेश,तो गर्व,ती नजरेतील मग्रुरी,सम्राट असल्याची गुर्मी हे सारे तो पार्टी दाखवे.सूत्रधाराशी त्याचे सवाल जबाब होत,सूत्रधार रावणास डिचवे,रामाचे गुणगान गात चिडवत असे.मग राम व रावणाचे थरारक युद्ध होई,रावणाचा वध हा नमनाचा परमोच्य बिंदू असे. दुष्ट शक्तींचे निर्दालन होऊन आनंदी मनाने सारे घरी परतत.
कधी कधी हि रावणाची पाटी डोक्यावर घेऊन काम करणाऱ्या पार्ट्याचे अंगात अशी काही भिणे कि,देवीस नारळ द्यावा लागे.तेव्हाच तो भूमिका सोडे. हा स्तिमित करणारा प्रकार मी पहिला आहे. पाटी सह थरथरणारा रावण पार्टी मी अनुभवला आहे.
आपण अनेक प्रसिद्ध नट पाहिले आहेत,त्यांच्या भूमिका अनुभवल्या आहेत,पण कोणतेच शिक्षण न घेता केवळ अनुभव व अवलोकनातून प्रामाणिक पणे कला सदर करणारी हि माणसे मनातून पुसता पुसली जात नाहीत. हाच खरा लोक कलेचा गाभा असावा,व त्याच मुळे हि लोककला शतकानुशतके जिवंत राहिली आहे.आज या कलेची काय स्थिती आहे?पारंपारिक नमनाचा कोठे लवलेश नाही. कॅसीओ,कर्ना यांचा कर्णकर्कश आवाज,उथळपणे कामुक अंगविक्षेप करीत सिनेमाच्या गाण्याचा चालीवर केलेले भयानक नृत्य,उथळ व फालतू संवाद,त्यामुळे मिनिटभर हि हे नमन पाहता येत नाही. तांत्रिक बदल जरूर करावेत पण मूळ लोकनाट्याचा गाभा नसेल तर प्रयोग फसणारच. कहर म्हणजे गवळणीवर होणारा दौलतजादा,हे म्हणजे शहरातील "डान्सबार"चा हिडीस प्रकार पवित्र अशा लोकनाट्यात येऊ पाहतो आहे. हे सर्व थांबविणे जरुरीचे आहे. नमन करणाऱ्या मंडळास प्रभोधनाची गरज आहे.शिमग्यात सहाणेवर गवळणी सोबत नाचून दौलतजादा करणारा माणूस मी पहिला व तो प्रकार सर्व आया बहिणी,वृध्द मंडळी,लहान मुले यांचा समोर झाला.मन विषन्न झाले. असे प्रकार थांबविले पहिजेत. हाच आदर्श जर लहान मुलांनी ठेवला तर?निदान सहाणेवर तरी असा प्रकार होणार नाही,याची काळजी आपण घेतली पहिजे. तरच हि सुंदर लोककला जिवंत राहील. अन्यथा आठव्या शतकातील हि लोककला आपल्या समोर अस्त पावेल. येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.

kosumb

बारभाई कारस्थान
-प्र.ल. सासवडकर

उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ. नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, तेव्हा त्यात सखाराम बापू, भगवंत बोकील, बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके, मालोजी घोरपडे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर ही प्रमुख मंडळी होती. रघुनाथरावाला पदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा; तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात. सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेची अखत्यारी ठेवावी असे ठरले. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असा उघड सामना सुरू झाला. यातूनच २६ मार्च १७७४ रोजी कासेगावची लढाई झाली. यात त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावाला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली. १८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाईला मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात येऊन १८ मे १७७४ रोजी त्याला पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. यानंतर बारभाईत मोरोबादादा फडणीस, भगवानराव प्रतिनिधी, बाबूजी नाईक, परशुरामभाऊ पटवर्धन, भोसले इ. मंडळींचा समावेश करण्यात आला. रघुनाथराव आणि बारभाई यांच्यात बरेच वर्षे संघर्ष चालू होता. रघुनाथरावाने इंग्रजांशी तह करून त्यांचा आश्रय घेतला .रघुनाथरावाला ताब्यात घेण्यासाठी बारभाईनी इंग्रजांशी १ मार्च १७७९ रोजी पुरंदरचा तह केला.

रघुनाथरावाशी संपूर्णपणे वाकडे धरू नये, असे तुकोजी होळकर, मोरोबादादा फडणीस आणि सखारामबापू यांना वाटत होते. यातूनच बारभाईत मतभेद वाढू लागले. सखारामबापू आणि मोरोबादादा फडणीस यांनी पेशवाईचा मालक सवाई माधवराव पण रघुनाथरावाने वडिलकीच्या नात्याने कारभार करावा, असा बेत करून १७७८ च्या मार्चमध्ये पुणे ताब्यात घेतले; पण महादजी शिंदे फौजेनिशी पुण्यास येऊन दाखल झाले व मोरोबाच्या कटाची इतिश्री झाली; मोरोबास कैद करून पुढे १८०० पर्यंत तुरूंगात ठेवण्यात आले. याच सुमारास मुंबई कौन्सिलने पुरंदर तहाच्या विरूद्ध कंपनीच्या संचालकांकडे तक्रार करून युद्ध चालू ठेवण्याचा हुकूम मिळविला. रघुनाथरावाला घेऊन कंपनीची छोटी फौज पुण्याच्या दिशेने निघाली. तळेगावजवळ तिला वेढण्यास येऊन वडगावचा अपमानकारक करार १३ जानेवारी १७७९ रोजी मान्य करावा लागला. यावेळी सखारामबापूंचा शत्रूपक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला आणि बापूंना कैद झाली. नाना फडणीसांना सर्वाधिकार प्राप्त झाले. पुढे कलकत्त्याहून सेनापती टॉमस गोडार्डच्या हाताखाली दुसरी फौज सुरतला येऊन दाखल झाली. युद्धास पुन्हा तोंड फुटले आणि १७८२ च्या मे महिन्यात सालबाईच्या तहाने ते थांबले. रघुनाथरावास सालिना तीन लाख रु. देऊन त्याने कोपरगावी रहावे असे ठरले.