Wednesday, September 21, 2011

.देव देवळात नाही ?

मुंबई                                                       //श्री जुगाई प्रसन्न //                    दिनांक ; १९/०२/२००८ 
                                                                                                                                 शिवजयंती
                           समस्त बारभाई ग्रामस्थ यांस सस्नेह नमस्कार.हे अनावृत्त पत्राचे  कारण म्हणजे गेल्या दोन महिन्यात आपला गावात घडलेल्या घटना होत.या पत्र द्वारे मनाची  घुसमट दूर करावी असा विचार मनात आला,म्हणून हा पत्र प्रपंच.
                          शी-वा-जी तीन धगधगत्या महाप्रतापी ज्वालाग्राही अक्षरांचा आपल्याला विसर  पडला कि काय ? सूर्यास हि लाजविणारी त्याची प्रतिभा क्षीण तर नाही ना झाली ? शिवरायांच्या नावाने श्वास घेणाऱ्या मराठा समाज्याची अशी सैरबैर अवस्था पाहून असे वाटणे अपरिहार्य आहे.पराभूत मनोवृत्तीच्या समाजात पुरोगामी विचारांचे बीज पेरणारे शिवराय  कायम पुरोगामीच होते.महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज पालथे जन्मले,सर्वत्र वार्ता पसरली आनंदाची.राजपुत्र झाला.पण कुणीतरी बोललेच,"राजे पालथे जन्मले,अपशकून झाला.आनंदावर जणू विरजण पडले.महाराजांचे कानी हि बातमी पोचली,महाराज लगेच म्हणाले,"आई भवानीनेच कौल दिला,राजपुत्र पालथा आला,आता सारी पातशाही तो पालथी घालील.अश्या अनेक प्रसंगांनी महाराज्यांनी आपल्याला जीवनाचा आदर्श शिकविला.सेनापती नेताजी पालकरचे शुद्धीकरण,परत हिंदू धर्मांतर हा असाच पुरोगामी विचार होता.
                                     आपल्या गावाचे काही गोमटे करावे,अश्या विचारांनी आपण सारेजण कामे करीत असतो.पण अश्या घटनांनी मन व्यथित होते.सारा विरस होतो.देव देवळात नाही,हा विचारच किती अविचारी.नाउमेद होते मन...... पण नवी उमेद देतात ते शिवरायच.दगड फोडताना १०० घाव फुकट गेल्या सारखे वाटतात,पण १०१ वा घाव यशस्वी होतो,दगडाच्या ठिकऱ्या उडतात.समाज परिवर्तनाचे गुंजे एवढे काम करताना,हा १०१ वा घावच यशस्वी होणार.श्री जुगाई आपल्या पाठीशी आहे,यश ती देणारच.
                                      समाज्यात प्रामाणिकपणे कार्य करीत असता,प्रत्येकाने विज्ञाननिष्ठ,विवेकी आणि तर्कशुद्ध विचारसरनीचा  अंगीकार करून,निर्भीडपणे निर्णय घावेत अशी अपेक्षा असते.काळ परवा पर्यंत योग्य दिशेने चालत असलेला आपला गाव अचानक दिशाहीन पालापाचोल्यागत सैरबैर व्हावा,याचेच दु:ख होते. गावात अनेक घटना घडल्या,काही निर्णय घेण्यात आले,त्यांची अंमलबजावणी करण्यात आली,त्या बाबतची साधी माहिती मुंबईत कळविण्यात आली नाही,म्हणजे आपण परत सन २००० चे अनुकरण करत नाही ना?अशी शंका येण्या इतपत या सर्व गोष्टी वाटतात.त्या मुळे परत काही मुलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणे क्रम प्राप्त आहे.जी गेली अनेक वर्षे शोधात आहोत,पण सविस्तर मांडत नाही.श्री जुगाई सेवा संघाची उदधीष्टे कोणती ?त्याच्या कार्यकक्षा कोणत्या ?गावाचे धार्मिक,सामाजिक निर्णयात सहभाग काय ?त्याचे अधिकार कोणते ?एखाधा धार्मिक,सामाजिक निर्णयात मर्यादा कोणत्या ? ज्या जुगाई सेवा संघाने ग्रामस्थ मंडळाची नियुक्ती केली  त्यांचे अधिकार,कार्यकक्षा व मर्यादा याचे सखोल विवेचन आता अपरिहार्य आहे.
                                      रूढी,परंपरा मानव निर्मित असून कालानुरूप,प्रसंगानुरूप  त्यात बदल करणे आवश्यक आहे.सुतकाबाबत सर्व पर्याय पडताळून आपण सर्वांनी सन १९९६ पासून अनेक बैठका,चर्चासत्रे, घेऊन सर्व जेष्ठ सभासद,सर्व मानकरी,ग्रामस्थ आणि श्री जुगाईच्या साक्षीने अंतिम निर्णय दोन वर्षा पूर्वी घेतला.तो कालानुरूप योग्य आहे.त्याचे इतर समाज्याकडून आणि आजूबाजूच्या गावातून स्वागत झाले. सूतक मानव निर्मित असून,ते समाज बंधनाचे एक प्रभावी अस्त्र होते.जेव्हा समाज एकत्र लहान गाव व शहरात होता.आज तो अनेक प्रदेशात विखुरलेला आहे.धर्म,पंथ,जात,देश अश्या कक्षा ओलांडून सर्वत्र पसरलेला आहे.त्या मुळे कर्मकांडात अडकून रहाणे कठीण आहे.सूतक मानवास बंधनकारक देवास कसे ?जर तसे असते तर पाहुण्यान कडून देव पुजला नसता.गावाचा निर्णय सर्व समक्ष होता,सर्व मान्य होता.गावाचा निर्णय गाव करतो,कोणी तीरहाईत कसा काय करू शकतो ? मी फारच संभ्रमात पडलो आहे.आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची मला गरज आहे.आम्ही सूतक पाळावे कि नाही ?सुतकाचे निर्णय लिखित स्वरुपात आहेत,ते कोणी व्यक्ती,कार्यकारिणी,वाडी व अन्यकोणीही व्यक्ती कशी काय बदलू शकते ?सर्वांनी दोन वर्षांपूर्वी मान्यता दिली आहे,मग हे नवे काय आहे ?
                              एकनाथांनी त्यांचे काळात समाजप्रबोधनासाठी भारुडांची रचना केली.देवाचे अस्तित्वा बद्दल भारुडात ते म्हणतात,
                                         एक नवल देखिले,चोराने एक गाव चोरिल,
                                         त्याचे मागे धावणे निघाले,चोर गाव नाहीसे झाले,
                                                      गावा नवता मुळीच पाया,वरला  गावकूस गेला वाया,
                                                      खंडून गेला मुळचा पाया,उडाले देऊळ देव गेला वाया//
चोराने एक गाव चोरले म्हणजे श्री विठ्ठलाने भक्ताचे चित्त रुपी गाव चोरले.चित्तास साठ्विणारा देह म्हणजे देऊळ,या देहावर मनाची सत्ता,पण ते तर सदैव वासनेच्या अधीन राहून खऱ्या सुखाची विस्मृती घडविते.असे चित्तच विठ्ठल रुपी चोराने चोरले,त्याला धरण्या साठी भक्त निघाले.पण विठ्ठलाच्या प्रभावाने भक्तच मुळी     चैतंन्यरुपी परब्रम्हात जातो,त्या मुळे विठ्ठल रुपी चोर व चित्तरुपी गाव दोन्ही नाहीसे होतात.आता मूळ प्रकृती चा भासच नाहीसा झाल्याने सगुण परमात्मा व त्याचे आधारे उभे असलेले विश्व रुपी देऊळ नाहीसे होते.हे प्रकृतीचे भास म्हणजेच सगुण देव,देहरूपी गाव,देऊळ,सारे उडून जाते.
तात्पर्य: भक्त जेव्हा ईश्वराच्या चिंतनात आपले चित्त एकाग्र केल्याने हरवतो,देहभान विसरतो,तेव्हा सर्व प्रकुतीचे खेळ संपून त्यास परब्रम्ह परमात्मा भेटतो.याला भागवतात निर्गुण निराकार देवभक्ती मानतात.हि भक्ताचे साधनेतील उच्चतम अवस्था मानली जाते.मग सगुण साकार व निर्गुण निराकार यात श्रेष्ठ भक्ती कोणती ?अर्थात निर्गुण निराकार भक्तीच.आमच्या मनात देव नसेल तर आम्ही तो देवळात कसा शोधणार ?
                      देव देव्हाऱ्यात नाही,देव नाही देव्हाऱ्यात.
                      देव चोरून नेईल,अशी कोणाची पुण्याई ?
आमची ग्रामदेवता श्री जुगाई आणि तिच्या परिवारातील देवता आमच्या मनामनात वसल्या आहेत.अगधी  प्रत्येकाच्या.मग त्या शोधताना अंत:करणात शोधल्या नाहीत का ?त्या साठी बाहेरचा माणूस पैसे देऊन बोलविलात.तो म्हणाला ते सर्व पटले ? आधी देव नव्हता, आता आला का ? नव्हता तर कुठे होता,कोणी चोरला  होता ?तो पुण्यवान कोण ?संतांची शिकवण व आपल्या सारख्या वडीलधाऱ्यांची मते अशी वेगळी असल्याने आमचे मनाचा गोंधळ उडाला आहे.त्या मुळेच आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे.
                   प्रतिगामी प्रवृतीना फट मिळाली,आपण करून दिली.पण त्याचे भगदाड होऊ नये या साठी आपण सर्वांनी सावधान राहले पाहिजे.अश्या प्रकारच्या घटनांनी समाज दोन पिढ्या मागे पडतो.आपल्या भावी पिढीवर याचा विपरीत परिणाम होऊन ती आपल्या पासून दूर जाते.प्रगत जगात असल्या भाकड कथा श्रद्धा न वाढविता अंधश्रद्धा वाढविण्यात मदद करतात.आपण सारे सूज्ञ आहात,माझी या द्विधा मनस्थितीतून सुटका करावी अशी मी सर्व वडीलधारी मंडळीना या पत्रा द्वारे विनंती करतो.येथेच थाबतो.

कळावे,
लोभ आहेच,तो वाढवा,
आपला कृपाभिलाषी,
दिलीप सीताराम जाधव.










                                  

No comments:

Post a Comment