Wednesday, January 29, 2014

मागील पोस्त मध्ये कबुल केल्या प्रमाणे यादव वंशातील ज्ञात राज्यांची माहिती देण्याचे मी म्हटले होते,पण काही कारणाने त्यास उशीर झाला.हेमाद्री पंडिताने व्रतखंडातील राजप्रशस्तीत यादवांचे मूळ प्रदेशाचे नाव "सेउनदेश"वा सेऊनमंडळ व राजधानीचे नाव सेऊन नगर असे दिलेले आहे.हे त्याचे म्हणणे त्यानंतर सापडलेल्या शीला व ताम्रपटाने खरे ठरले आहे,दान दिलेल्या गावांच्या नावांवरून हा सेऊन देश नासिक,नगर,औरंगाबाद या भागाला म्हणत असावे असे दिसते.यादवांच्या साम्राज्याचा विस्तार हा पश्चिमे कडून पूर्वे कडे असा झालेला दिसतो.त्या काळातील काही कवी,ग्रंथकार यादवांचा सेऊन भूपाल असा करतात.थोडक्यात दृढप्रहार हा यादव कुळातील प्रतम ज्ञात नृपती असून त्याचे राज्याचा प्रारंभ याच सेऊनदेश्या पासून झाला.आपण ठरल्या प्रमाणे याच दृढ प्रहरी पासून सुरवात करून यादवांचा दैदीप्यमान इतिहासाचा आढावा घेण्याच्या प्रयत्न करू या.
दृढ प्रहार वा दृढप्रहरी :
हेमाद्री वा हेमाडपंत यादवांच्या पौराणिक राज्याचा व्रज-प्रतीबाहु-सुबाहु असा क्रम लावतो.याच सुबाहु ने आपले राज्य चार मुलांना वाटून दिले.त्यात त्याचा पुत्र दृढप्रहार यास दक्षिणे कडील भाग मिळाला.सुबाहु पूर्वीचे राजे द्वारावती प्रदेश्यातील होते,श्रीकृष्णा पासून ते द्वारकेत आले.डॉ.रा.गो.भांडारकरांनी यास पुष्टी दिली आहे.दृढ प्रहरी हा अतिशय कष्टाने व स्वकर्तुत्वाने राजा झाला.तो तरुण असतानाच पराक्रमी योद्धा होता.त्याने गावावरील चोरांचे आक्रमण मोठ्या शौर्याने परतून लावले,त्यामुळे त्यास नगररक्षक पद मिळाले.याच सेऊनदेश्यात पुढे त्याने आपले राज्य स्थापले.या पराक्रमी राजाचा वसई ताम्रपटात तसा उल्लेख आहे.यानेच चंद्रदित्यपूर आजचे चांदोर व श्रीनगर म्हणजे सिन्नर हि गावे वसवली.याचा काळ साधारण ८६० ते ८८० इसवी असावा.याच काळात अमोघवर्ष प्रथम हा दुर्बल सम्राट राष्ट्रकूट गादीवर होता.त्यास वेन्गीचे चालुक्य,गंगवडीचे गंग व माळव्याचे परमार याचा सतत त्रास असे.त्यामुळे सेउनदेश प्रदेशात त्याला प्रहरी सारखा पराक्रमी सामंत असणे आवश्यक होते.याचा दृढप्रहारीने अचूक फायदा उचलला.त्यानंतर गादीवर आलेल्या सेऊनचंद्र प्रथम याची माहिती पुढील वेळी घेऊ या.
देवगिरीच्या यादवांचे महत्व महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्य साधारण असेच आहे.त्यांच्या कर्तुत्वाने महाराष्ट्रात मराठी भाषा व हिंदू संस्कृती रुजण्यास मदत झाली,हि यादवांनी महाराष्ट्र भूमीला दिलेली देणगी आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.
प्रथम मथुरा मग द्वारका आणि तेथून सर्व महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात,मध्यप्रदेश,राजपुताना अश्या अनेक राज्यात आपली सत्ता गाजविणारे अनेक राजे यादव वंशात होऊन गेले.यादव वंशातील पौराणिक राज्यांचा फक्त आढावा घेत आपण दृद्प्रहर या ज्ञात राजा पासून प्रारंभ करत सर्व प्रभावी यादव राजांचा त्रोटक इतिहास या सदरात आपण माहित करून घेणार आहोत.म्हणजे आपण या कुळात जन्म घेतल्याचा असणारा सार्थ अभिमान दुणावेल.
यादव वंशाचे सार्थ वर्णन हेमाद्री वा हेमाडपंत याने महादेवराय यादवच्या दरबारी असताना लिहिलेल्या "राजप्रशस्ती" ग्रंथात दृद्प्रहाराचे आधीचे ५५ राजांचा उल्लेख केला आहे.सोम(चंद्र)पासून सुरु झालेली हि यादवांची वंशावळ नहुष,ययाती,यदु,ते सुबाहु पर्यंत येऊन भिडते.आता विषय आला तर काही पौराणिक संदर्भ देतो.शतपथ ब्राह्मणात प्रलय व त्या पासून मानव जातीस वाचविणारा मनुचे वर्णन आहे.तोच मानवजातीचा मूळ पुरुष मानला जातो.सोमाचा मुलगा पुरुरवा सोमवंशाचा संस्थापक मानतात.त्याने १०० अश्वमेध यज्ञ केले.त्याचा मुलगा आयु याचा विवाह दानव कन्या प्रभा हिच्याशी झाला.आयु नंतर नहुष याने तर स्वर्गावर स्वारी केल्याचा उल्लेख आहे.त्याचा मुलगा यदु,यदूचा मुलगा क्रोष्ट्रा याच क्रोष्ट्राच्या वंशजांना "यादव"संबोधले जाते.
याच वंशातील भिमरथाची कन्या दमयंती निषाद देशाचा राजा नळ याला दिली होती.पुढे वृष्णी राजाचा वंशात वसुदेव व त्याचा पुत्र कृष्ण जन्मास आले.यादवी नंतर विखुरलेल्या पण महापराक्रमी यादवांनी मालवा,राजपुताना,मध्यप्रदेश,महाराष्ट्र राज्यात आपापली राज्ये स्थापन केली व वाढविली.हा झाला यादवांचा पौराणिक इतिहास.
मध्ययुगीन काळात यादवांचा प्रभाव अधिक वाढत गेला.मान्यखेटचे राष्ट्रकुट व कल्याणीचे चालुक्य यांचे मांडलिक असा राजकीय प्रवास करत सार्वभौम सत्ता स्थापण्या पर्यंत ते यशस्वी झाले.राष्ट्रकुट व कल्याणीचे चालुक्य यांची सत्ता कर्नाटकात होती.त्यामुळे त्यांचे मांडलिक यादव हि कर्नाटकी असावेत असा अपसमज होता.कारण यादव वंशातील राजे व राण्यांची नावे कानडी आहेत.उदा.माल्लुगी,धाडीअप्पा,जैतुगी,भिल्लम त्यांचे विवाह काही कर्नाटकी राजक्न्न्यांशी झाले असले तरी यादव मूळ द्वारकेतून महाराष्ट्रात आले हे खरे आहे.कारण सापडलेल्या कोणत्याही ताम्र्शीलालेखात ते कानडी असल्याचा उल्लेख करत नाहीत पण द्वारकेचा उल्लेख मोठ्या अभिमानाने करतात.
पुढे वेळ मिळेल तसा आपण यादवांचा शेवटचा पौराणिक राजा सुबाहुचा मुलगा व प्रथम अर्वाचीन ज्ञात राजा दृध्प्रहारा पासून एक एक राजा विषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करूया.हे सारे फार रंजक असेल,आपली कुळी कशी होती हे पाहणे खचितच नव प्रत्ययकारी ठरेल.कारण इतिहास माणसाला वर्तमानाचे भान देतो व भविष्याचा वेध घेण्याचे सामर्थ देतो.